रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत शिक्षण केंद्रातून उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र वितरण करण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. त्या वेळी ते बोलत होते. ते हिमाचल प्रदेशातून आले आहेत. या वेळी केंद्राच्या समन्वयक, संस्कृत विभागप्रमुख आणि उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. स्नेहा शिवलकर उपस्थित होत्या. १२ ते ७० वर्षे वयोगटांतील ७२ जणांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. रा. भा. शिर्के प्रशाला व जीजीपीएस शाळेतील विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेतले. या सर्वांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
दीपक जोशी यांच्या सहकार्याने गणपतीपुळे येथेही केंद्र सुरू होते. सहभागी परीक्षार्थी अक्षया भागवत, वैद्य संतोष केळकर, शीतल घनवटकर, सार्थक, गीता पंडित, नारायणी शहाणे, शीतल पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
‘किमान २० व्यक्ती, तसेच गृहनिर्माण संस्थांमधील व्यक्तींनी या वर्गासाठी एकत्रित अर्ज केल्यास त्यांना संस्कृत शिकवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सेवानिवृत्त, गृहिणींनी सहभाग घेतल्यास या उपक्रमाचा हेतू सफल होईल,’ असे आवाहन महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. आठल्ये यांनी या प्रसंगी केले.
पुढील वर्गात सहभागी होण्यासाठी संपर्क : डॉ. कल्पना आठल्ये- ७७२०० ३२३०२.